पशुसंवर्धन विभागात समुपदेशनाने बदल्या   

पुणे : पुन्हा एकदा इतिहास घडविताना या ऐतिहासिक क्षणाची मी साक्षीदार होत आहे, याचा मला आनंद आहे. अधिकार्‍यांचे मनोबल वाढवून भ्रष्टाचार मुक्त धोरण राबविणे यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकार्‍यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्याचा निर्णय मी घेतला आहे. हा निर्णय भविष्यातही कायम राहिल. गाव पातळीवर कष्ट करणार्‍या सर्व सामान्य लोकांच्या चेहर्‍यावरचा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तुमच्या बदल्या मनासारख्या केल्या आहेत. आता चांगले आणि प्रफ्फुलित मनाने काम करा, अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी अधिकार्‍यांशी संवाद साधला.
 
राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा आणि  बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी. यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व सहायक आयुक्त या संवर्गातील बदल्या समुपदेशनाने करण्याचा निर्णय मुंडे यांनी नुकताच घेतला. गुरुवारपासून आयुक्त पशुसंवर्धन यांच्या कार्यालयात बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामस्वामी, आयुक्त प्रविणकुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतल मुकणे यावेळी उपस्थित होते.
 
पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामविकास मंत्री असताना शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांचा निर्णय मी घेतला होता. त्यावेळी त्याचा फायदा अनेक शिक्षकांना जे तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते, त्यांना झाला. आऊट ऑफ बॉक्स जाऊन निर्णय घेण्याची आवड असल्याने आताही पशुसंवर्धन विभागासाठी मी हा निर्णय घेतला, घेतलेला निर्णय बदलत नाही. त्यामुळे भविष्यातही हा निर्णय कायम राहणार आहे. माझे वडील गोपीनाथ मुंडे हे नेहमी म्हणायचे, ज्याची पत नाही, ऐपत नाही. त्यांचा आवाज बनण्यासाठी मी राजकारणात आहे. तोच वारसा घेऊन मी काम करत आहे. माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही काम करता. त्यामुळे हा निर्णय घेतला. सर्व सामान्य लोकांच्या चेहर्‍यावर आनंद मला महत्त्वाचा वाटतो. वर्षानु वर्षे एकाच ठिकाणी आपल्या परिवारापासून दूर असणारे आदिवासी क्षेत्रात काम करणार्‍या अधिकार्‍यांना यामुळे हवी ती पोस्टींग मिळणार आहे. हव्या त्या ठिकाणी बदल्या झाल्याने तुमच्या चेहर्‍यावरील दिसलेला आनंद समाधान देणारा आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
पशुसंवर्धन सचिव डॉ. रामास्वामी म्हणाले, पशुवैद्यकांना लोकसेवक म्हणून पशुसेवा करण्याची उत्तम संधी प्राप्त होत असते. पशुसंवर्धन विभागाचा आजवरचा गौरव टिकवून ठेवत या विभागाची प्रतिष्ठा आणखी उंचवण्यासाठी सामूहिक जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त अवघड क्षेत्रात असलेल्या ११८ आणि बिगर अवघड क्षेत्रात असलेल्या ४४४ अधिकार्‍यांच्या बदल्या त्यांच्या मनाप्रमाणे करण्यात आल्या.

Related Articles